लीळा-कीर्ती कठीयाचा दृष्टांत

लीळा-कीर्ती कठीयाचा दृष्टांत

◾म्हाइंभट-मराठीतील पहिले चरित्रकार.महानुभाव पंथाचे प्रवर्तक.

लीळा स्पष्टीकरण◾

◾डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते: ते सी बाजत होते:तेणे भक्तीजनासी व्यापार होववे ना:आन भट व्यापार करू लागले:

अर्थ:- सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे वास्तव्य डोमेग्राम (सध्याचे कमालपुर ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) येथे असताना ही प्रस्तुतची लीळा घडलेली आहे. गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या या गावात एक दिवस सकाळचा पुजाविधी आटोपल्यानंतर (उदेयाचा-सकाळी)सर्वज्ञांच्या ठिकाणी परीवारातील भक्तजन मातीकाम करीत होते. ते हिवाळ्याचे दिवस आणि नदीकाठ त्यामुळे प्रचंड प्रमाणात थंडी वाजत होती. (सी - थंडी) त्यामुळे भक्तजनाना काम करता येत नव्हते. मात्र स्वामींचे एक शिष्य नागदेव (लीळाचरित्रात नागदेवआचार्यांचा उल्लेख भट या नावाने ही आढळतो) यांचे मात्र तसल्या थंडीतही काम चालुच होते.

◾नाथोबाए म्हणीतले:"नागदेया:तू कैसा काही हींवसी ना?" तव भटी म्हणीतले:"आम्ही वैरागी:काइसीया हीवु:" यावरी सर्वज्ञे म्हणीतले:"वानरेया:पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडे:हाही एकू विकारुचि कीं गा:"यावरि भटी म्हणीतले:"जी जी: निर्वीकार तो कवण:"

अर्थ:-ते पाहुन स्वामींचे दुसरे शिष्य नाथोबा त्यांना म्हणतात 'हे काय नागदेवा तुला थंडी वाजत नाही का ?' (हीवसी ना - थंडी वाजत नाही का ?) यावर नागदेव उत्तर देतात, आम्ही वैरागी माणसे साधु संत आम्हाला कसली आलीय थंडी. हा चाललेला प्रसंग सर्वज्ञ पाहत होते ते नागदेवाचे उत्तर ऐकुन म्हणतात, 'हे बघा जीवाला स्वतःचे वैराग्य सुध्दा मिरवायला आवडते, जीव असा आहे की तो आपल्या वैराग्याचे ही प्रदर्शन मांडतो कारण त्याला समोरच्या कडून प्रशंसेची कौतुकाची अपेक्षा असते. 'हे असे वागणे 'हे विकाराचेच कार्य आहे (विकार म्हणजे सामान्य अर्थाने आवडी, लालसा) यावर नागदेवानी सर्वज्ञाना विचारले 'तुम्ही म्हणतात की जीवाला वैराग्याचे प्रदर्शन करायला आवडते हा एक विकार आहे तर मग या संसारात निर्विकार असा कोण आहे .

◾सर्वज्ञे म्हणीतले:"वानरेया:पोर जीव वीकारावेगळा केव्हेळाही जालाचि नाही:मा तु काई वेगळा अससि:" "हो कां जी:" यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टांत निरोपीला: "कव्हणी एकू कठीया असे:तो भोगस्थानाची सुश्रुषा करी:झाडी:सडा संमार्जन करी: ते देखौनि गावीचे म्हणति: 'कठीये हो नीके करीत असा:बरवे करीत असा:'ते आइकौनी दीसवडीचा दीसवडी हात हात चढवी:तयासि देवता आपुले फळ नेदी:तयासि किर्तीचेचि फळ झाले:"

अर्थ:- यावर स्वामी सांगतात की ' या संसारामध्ये कोणताही जीव विकारावेगळा होत नाही' यावर स्वामींनी कीर्तीकठीयाचा दृष्टांत निरुपण केला. (कीर्ती - प्रसिध्दी, कठीया - पुजारी)(दृष्टांत - स्वामी निरनिराळ्या प्रसंगी आपल्या प्रवचनात एखादा तत्वज्ञानपर विषय समजावताना एखादे उदाहरण देत कथा आख्यायिका सांगत, त्यालाच दृष्टांत असे म्हणतात.) सर्वज्ञ सांगतात कोणत्यातरी एका गावात एक पुजारी राहायचा. तो त्या गावातील एका नवसिक देवतेची भक्ती करायचा. त्या ठिकाणी राहुन देवतेची सेवा करायचा झाडलोट करणे, सडा संमार्जन करणे, सारवणे स्वच्छता ठेवणे ही सर्व कामे तो त्या ठिकाणी करीत असे. त्याची ही स्वच्छता पाहुन गावची लोक त्याची स्तुती करु लागले, प्रशंसा करु लागले, लोक म्हणत पुजारीबाबा चांगले करत आहात. सर्व कसे सुंदर करीत आहात. प्रशंसेेच्या स्तुतीच्या हव्यासापायी तो दिवसेंदिवस अधिकाधिक स्वच्छताच करु लागला. हातहातभर वाढीव स्वच्छता करु लागला .कारण त्यामुळे लोक त्याची अधिकाधिक स्तुती प्रशंसा करीत असे. याचा परिणाम असा झाला की तो पुजारी देवताभक्ती  पेक्षा स्वच्छतेलाच जास्त महत्व देऊ लागला. परिणामत्वे देवतेची पुजाअर्चा उपासना तो करेनासा झाला. याचा तात्पर्यार्थ सांगताना स्वामी सांगतात की ,त्याच्या अशा करण्यामुळे देवता त्याच्यावर उदास झाली त्यामुळे देवतेनी त्याला आपले भक्तीच्या उपरांत मिळणारे साध्यफळ दिलेच नाही' त्याला लोकांची स्तुती हेच फळ मिळाले. यावरुन सिध्दांतबोध असा की लोक आपल्या प्रसिध्दीसाठी आपल्या कामाचे प्रदर्शन करताना आढळतात परंतु यातून त्यांचे ध्येय सिध्द न होता. फक्त कीर्तीच होते. (लीळाचरित्र उत्तरार्ध:एकांक लीळा क्र.१२०)

©लीळा अनुवाद:-महानुभाविय गोपाल कपाटे गुरुजी आणि मृणाल पाटोळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

या झोपडीत माझ्या

धरिला पंढरीचा चोर

जैसा वृक्ष नेणे