जैसा वृक्ष नेणे
संतवाणी-(अ) जैसा वृक्ष नेणे
◾कवी परिचय:-संत नामदेव (१२७०-१३५०) वारकरी संप्रदायातील संतकवी. 'मराठी'तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार.
◾अभंगरचना- सकलसंतगाथा खंड पहिला:- संत नामदेव महाराजांची अभंगगाथा, त्यांनी हिंदीतही रचना केल्या आहेत.
◾भाषा- अतिशय उत्कृष्ट ,सुबोध,सरळ,साधी.
विशेष-शिखांच्या 'गुरू ग्रंथसाहेब' या ग्रंथात ६१कवने समाविष्ट. 'भक्त नामदेवजी की मुखबानी' या नावाने प्रसिद्ध.
◾ अभंग परिचय◾
वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गचं देणं म्हणजे वृक्ष. प्रस्तुत अभंगात संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितली आहे.
◾ अभंग स्पष्टीकरण◾
जैसा वृक्ष नेणे मान अपमान|
तैसे ते सज्जन वर्तताती||
मानवाच्या ऐहिक आणि आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणाऱ्या स्थितप्रज्ञ अशा वृक्षाची उपमा नामदेवांनी सज्जनांसाठी(संत) योजिली.ती अतिशय समर्पक आहे. या वृक्षाप्रमाणे हे संत,सज्जन व्यक्ती मान-अपमान यांच्या पलीकडे जाऊन वर्तन(आचरण) करतात. वृक्ष ज्या प्रमाणे वनचरे,पक्षी या सर्वांना निवारा देतात. त्या प्रमाणे संत व्यक्ती आपल्या सान्निध्यात येणाऱ्या सर्व लोकांचे कल्याण करतात. त्यांना स्वतःच्या स्थितप्रज्ञ आचरणातून मान- अपमान या व्याख्येपलीकडे जाण्याचा मार्ग दाखवितात आणि त्यांचा अध्यात्मिक उद्धार करतात.
येऊनिया पूजा प्राणि जे करिती|
त्याचे सुख चित्ती तया नाही||
अथवा कोणी प्राणी येऊनि तोडिती|
तया न म्हणती छेदू नका||
आपली संस्कृती पर्यावरण पूजक आहे.पण आपल्याला या पर्यावरणाच्या मोठेपणाचा विसर पडला आहे.नामदेव महाराज यांची जाणीवही वरील ओळीतून करून देतात. ज्या प्रमाणे वृक्षाच्या मनात त्याला सन्मान देणाऱ्याबद्दल ना सुख(आनंद) असते ना त्याची तोडणी करणाऱ्या बद्दल राग. वृक्ष कोणालाही माझा सन्मान करा किंवा माझी तोडणी करू नका असे सांगत नाही. दोन्ही गोष्टी मोठ्या मनाने वृक्ष स्वीकारतो.वृक्षाच्या सान्निध्यात कोणी ही आले तरी त्याला सुखच देतो.
निंदास्तुति सम मानिती जे संत|
पूर्ण धैर्यवंत साधु ऐसे||
वरील उपमेचा आधार घेऊन नामदेव महाराज म्हणतात की,या प्रमाणे संतांची वृत्ती असते. समाजात वावरताना त्यांना मिळणाऱ्या सन्माना बद्दल किंवा निंदा-स्तुती बद्दल काहीच वाटत नाही.संत या गोष्टीने हुरळून जात नाहीत. धैर्यशील वृत्तीने सामोरे जातात. सन्मान देणारे आणि निदा-स्तुती करणारे दोन्ही ही संतांना सारखेच असतात. त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या सर्वांचा आत्मिक उद्धार करतात. नामदेव महाराजांनी वृक्षामधील असलेल्या स्थितप्रज्ञ आणि धैर्यशाली
वृत्तीची संतांचा वर्तणुकीसाठी समर्पक उपमा वापरली आहे.
नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी|
तरी जीव शिवा गांठी पडूनि जाय||
अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज या संतांच्या भेटीमुळे होणारा फायदा वर्णन करतात.ते म्हणतात,अशा संतांच्या सान्निध्यात जरी आपण आलो तर जीव शिवाची गाठ पडली असे समजावे. संतांच्या सान्निध्यात आपली आत्मिक उन्नती होऊन आपल्यातील जीवाला खरे ज्ञान(शिव) प्राप्त होईल.
©मृणाल पाटोळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
उत्तम रसग्रहण
ReplyDelete👏👍👌🙏
ReplyDeleteThanks google
ReplyDeleteChhana
ReplyDelete👏👍
ReplyDelete